बर्याच दिवसांपासून घोळत असलेल्या काही ओळी, पूर्ण होऊनही आता महिना उलटत आला.. आणिक काही सुचतंय का हे बघत होतो.. पण नाही सुचले. म्हणून मग आता प्रकाशित करतोय.
संदर्भः
उन्हाळ्यात आमच्या सोसायटीत पाणी कमी पडतं म्हणून टँकरनं पाणी भरणं चालू
होतं. सकाळी ६ तास व संध्याकाली ६ तास असं. पण नंतर २४ तास पाणी असायला
हवं... मग त्यासाठी जेवढे टँकर्स लागतील तेवढे बोलवावेत असं ठरवण्यात आलं.
५०-६० जणांच्या मिटिंगमधे मी धरून केवळ ३ जण म्हणत होतो की पाण्याचं
रेशनिंग असावं. पण कुणीही ऐकलं नाही. दिवसाला कमीतकमी १० टँकर्स लागत होतेत
२ महिने. त्या मिटिंगमधे मी बोललो होतो की, अरे थोडी तरी लाज वाटायला हवी
आपल्याला.. बाकी आपण कुणाला काहीही मदत करत नाही.. पण कमीतकमी पाणी तर जपून
वापरू शकतो ना.. तेवढं तरी केलं पाहिजे.. पण कुणाला काही पटलं नाही.
त्यावेळी मन इतकं विषण्ण झालं की.. असो.
ती भावना, ती सल कुठेतरी मनात घर करून होती. त्यातून आलेल्या या ओळी..
--
रंग कुणाचे कसे कळावे, मनी कुणाच्या खोट वसे?
चेहर्यावरला रंग.. असू दे.. सत्याचा मज त्रास नको..
स्वच्छ असावे माझे अंगण, ऋण देशाचे मला कसे?
घाण कुठेही असू देत ती.. मजला त्याचा जाच नको..
रणात ज्यांनी रक्त सांडले, रक्ताची त्या शपथ कुणा?
सुखासीन मी.. झिंग चढू दे.. दु:खाचा आभास नको..
पोटाच्या काठावर जगती.. किती जीव ते, घुसमटलेले..
कोठार माझी.. मला[च] हवी ती.. फुका कुणाचा त्रास नको..
पाण्यासाठी वणवणणारी.. बाया आणिक लहान पोरे..
सौद्यातील "उपभोग" खरा.. मज.. करुणेचा गळफास नको..
पणतीच्या वातीतून उठते, ज्योत दिव्याची, प्रकाशणारी..
तेजाचा हव्यास मनाला..वाती-जळता वास नको..
--
राष्ट्र असावे मनात आधी, स्वार्थाचा आवाज नको..
अभिमानाची मान असावी, नुसता कोरा माज नको..
राघव
[ २०१९ ]
No comments:
Post a Comment